ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांच्या वाहतूकीवर प्रतिबंध

पोलिस विभागाचे कडक निर्देश

-स्कूलबस चालकांची आयुक्तालयात बैठक
-वाहतूक व परिवहन विभागाची उपस्थिती
अमरावती / 17 जून: शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑटोरिक्षातून केल्या जाणार्‍या वाहतुकीवर पोलिस प्रशासनाच्यावतीने पूर्णत: प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे कडक निर्देश पोलिस विभागाने दिले आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांकरिता ऑटोरिक्षातून होणारी वाहतूक धोकादायक असून त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त संजय खताडे यांनी सांगितले.
आज अमरावती पोलिस आयुक्तालयात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूकीसंदर्भात स्कूल बस चालक व अन्य संबंधितांची एक बैठक पार पडली. यावेळी एसीपी खताडे आणि अन्य अधिकार्‍यांनी आवश्यक त्या सूचना करुन निर्देश जारी केले. स्कूल बस चालकांनी नियमांचे उल्लंघन करता कामा नये. विद्यार्थ्यांना स्कूलबसमधून वाहून नेण्याचे काम सुरु होण्यापूर्वी सर्व चालकांनी आरटीओशी संबंधित नियमांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करुन घ्याव्यात, असे यावेळी सूचविण्यात आले. स्कूल बस चालकांनी मांडलेले प्रश्न यावेळी अधिकार्‍यांनी ऐकुण घेतले. त्यावर तोडगा काढण्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलिस आयुक्तालयातील बेसमेंटमध्ये पार पडलेल्या या बैठकीला शहरातील स्कूल बस व व्हॅन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी आरटीओ शरद वाडेकर, वाहतूक निरिक्षक रिता उईके आणि ज्योती विल्हेकर व अधिकारी उपस्थित होते. ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
-स्कुलबस चालकांसाठी दिशानिर्देश
-वेग प्रमाणपत्राचे नूतणीकरण आवश्यक
-वाहनाचे फिटनेस आणि चालकाचा परवाना अनिवार्य

-स्कूल बस चालकाकडे ओळखपत्र असणे अनिवार्य
-तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनाचा वापर नको
-चालकाकडे परवाना, चरित्र प्रमाणपत्र, पीयूसी, विमा आवश्यक
-कायदेशिर नियमांचे पालन अत्यावश्यक
-मद्यप्राशन करुन वाहनचालकाने वाहन चालवू नये
-विद्यार्थ्यांसोबत कुठलाही अनूचित प्रकार होता कामा नये
-बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक नको
-संकटकालीन मार्गाची माहिती विद्यार्थ्यांना असावी

संबंधित बातम्या

Back to top button