ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी का केली?

धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरे यांचा गद्दार खासदारांवर हल्लाबोल

धाराशिव/28 जून-शिवसेना ठाकरे गटात नुकतीच एक मोठी आणि धक्कादायक फूट पडल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या एकूण 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार उरले आहेत. मात्र, पक्षात झालेल्या या प्रचंड पडझडीनंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे ‘अ‍ॅरक्शन मोड’मध्ये आले आहेत.
ज्या ज्या खासदारांनी गद्दारी केली, त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना आव्हान देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला असून, आज धाराशीवचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात त्यांची तोफ धडाडली. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर, इतर बंडखोर खासदार आणि महायुती सरकारवर अत्यंत बोचर्‍या शब्दांत हल्लाबोल केला. धाराशीवच्या या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या भवितव्याबाबत एक मोठे आणि खळबळजनक विधान केले. ते म्हणाले की, जरी हे 6 खासदार दोन तृतीयांश बहुमताचा दावा करत असले, तरी हे सर्व बंडखोर खासदार कायदेशीर कचाट्यात अडकून लटकणार आहेत. याचा खुलासा करताना त्यांनी सांगितले की, आमचे दोन खासदार नुकतेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून आले आहेत. जेव्हा आमच्या खासदारांनी त्यांना देशाची राज्यघटना दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ओम बिर्ला म्हणाले की, राज्यघटना माझ्याकडेही आहे. यावर आमच्या खासदारांनी त्यांना संविधानातील पक्षांतर बंदीचा नेमका नियमच समजावून सांगितला आहे. 6 खासदार फुटल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून आपली सुटका होईल, असा जो गैरसमज या बंडखोरांचा झाला आहे, तो लवकरच दूर होईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट ‘भाव वाढवून’ गेल्याचा गंभीर आणि खोचक आरोप केला. ते म्हणाले की, या सर्व खासदारांचे आधीपासूनच तिकडे जाण्याचे ठरले होते, अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. परंतु, ओमराजे निंबाळकर हे जाणीवपूर्वक अडून बसले होते.
कारण त्यांना गणित चांगले ठाऊक होते की, जोपर्यंत 6 खासदार एकत्र येत नाहीत, तोपर्यंत दोन तृतीयांश ही कायदेशीर संख्या पूर्ण होत नाही. आधी 5 जण तयार होते, पण सहावा खासदार मिळाल्याशिवाय कायदा आपल्याला सोडणार नाही हे समजल्यामुळेच ओमराजेंनी शेवटपर्यंत ताणून धरले, स्वतःचा भाव वाढवून घेतला आणि मगच त्यांनी पलटी मारली, असा घणाघात ठाकरेंनी केला. भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी पक्षांतर बंदी कायद्याचा थेट दाखला देत बंडखोरांचे दावे खोडून काढले. ते म्हणाले की, जरी दोन तृतीयांश संख्येने खासदार इकडचे तिकडे गेले, तरी कायदा त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देत नाही. मूळ पक्षाचे अस्तित्त्व संपवून कुठेतरी विलीन होण्याचा निर्णय हा केवळ मूळ पक्षाची संघटनाच घेऊ शकते, खासदार किंवा आमदार स्वतःहून तो निर्णय घेऊ शकत नाहीत. पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय पक्ष संघटनेने घेतल्यानंतर, त्याला खासदारांनी दोन तृतीयांश बहुमताने पाठिंबा देणे गरजेचे असते. त्यामुळे या खासदारांचे थेट पक्षांतर बेकायदेशीर ठरते.

Back to top button