मिनी मंत्रालयात महायुतीचा ‘गुलाल’, मविआ ‘भूईसपाट’
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निकाल

* भाजप 225 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष
* राष्ट्रवादीचे 172, शिंदे शिवसेना 162 जागांवर विजयी
* देवेंद्र फडणवीस-रविंद्र चव्हाण जोडीचा विजय
मुंबई/9 फेब्रुवारी – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. नगरपरिषद, महानगपालिकेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपनंच बाजी मारलीय, मविआला जिल्हा परिषदेमध्ये खातंही उघडता आलेलं नाही.
महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषद, नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनंच विजयाचा झेंडा फडकवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर भाजपपाठोपाठ शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. जिल्हा परिषदेतही भाजपनं विजयाची घौडदौड कायम ठेवत आपणच बाहुबली असल्याचं दाखवून दिले आहे. मात्र, या निकालात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजप 225 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षाने 172 जागांवर विजय मिळवत राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदेच्या शिवसेनाला 162 जागा मिळवण्यात यश आले. शिवसेना हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष ठरला. ठाकरेंच्या शिवसेनेला 46 जागा, मनसेला 2 जागा, काँग्रेसला 55 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 21 जागा, आणि इतरांना 33 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. 12 जिल्हा परिषदांपैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा-12 जिल्हा परिषदांपैकी भाजपनं 8 जिल्हा परिषदांवर झेंडा फडकवलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेनं 3 तर दादांच्या राष्ट्रवादीनं एका जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केलीय. तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. तर 125 पंचायत समितींपैकी भाजपनं 51 ठिकाणी विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं 32, राष्ट्रवादीनं 28, काँग्रेस 7, ठाकरेंच्या शिवसेनेनं 5, पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 पंचायत समितीवर विजय मिळवला आहे.




