महापालिकांमध्ये भाजपचे 47 नगरसेवक बिनविरोध
मुख्यमंत्र्यांचे ‘ऑपरेशन मनधरणी’ यशस्वी

* महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या पोहोचली 64 वर
मुंबई/2 जानेवारी – राज्यातील महानगरपालिकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच भाजप-महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यातील 10 महापालिकांमध्ये भाजपचे तब्बल 47 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर महायुतीला (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) एकूण 64 जागा बिनविरोध मिळाल्या. यात शिवसेनेला 15, तर राष्ट्रवादीच्या 2 जागांचा समावेश आहे.
महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्रपक्षांतील नाराजीमुळे वातावरण तंग झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन बंडखोरांशी संवाद साधला. सातार्यातील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ते फोनवरून नाराज नेत्यांशी बोलताना दिसले. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणार्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना भविष्यात महापालिकेत स्वीकृत सदस्य किंवा राज्य-जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये संधी देण्याची हमी दिली. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भाजपला सर्वाधिक 47 जागा बिनविरोध मिळाल्या.




