राज्याला पावसाचा तडाखा, मान्सून जोरात सक्रिय

मुंबई कोकणात मुसळधार

-प. विदर्भात विखुरलेला पाउस
-अनेक जिल्ह्यांमध्ये जिवितहानी
मुंबई / 16 जून: राज्यात 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून (16 जून) मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. रविवारी (15 जून) रात्रीपासून सतत बरसणार्या पावसाने आज सकाळी आपला जोर वाढवत मुंबईसह कोकणाला चांगलाच तडाखा दिला. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारे व मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी नदी नाल्यांसह शहरांतील रस्ते-रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. बाजारपेठा, घरांमध्ये पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले. याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा तर, पूर्व विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून 2, तर जालना जिल्ह्यात 3 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून 3 व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे. तर, भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून 2 व्यक्तींचा मृत्यू आणि 4 व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 112.7 मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 110.7 मिमी, मुंबई शहर 100.4 मिमी, मुंबई उपनगर 86 मिमी, रायगड 72.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, 22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.
1 ते 16 जूनदरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे. आयएमडीने पुढील 24 तासांकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
-विदर्भात पेरणीची घाई नको
राज्यात मान्सून पून्हा सक्रिय झाला असला तरी, अद्याप काही भागांमध्ये आणि प्रामुख्याने विदर्भात आवश्यक तेवढा पाऊस पडलेला नाही. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागातील कोरडवाहू शेतकर्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button