शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पून्हा मैदानात
8 जूनपासून बेमुदत उपोषण

-गुरुकुंज मोझरीत करणार आंदोलन
अमरावती / 4 जून: शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग यांच्या असलेल्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. या विरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. येत्या 8 जुनपासून ते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. गुरुकुंज मोझरी येथे कार्यकर्त्यांसह अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका मांडली आणि सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे. शेतकर्याची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग व विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन द्या, मनरेगा वरील मजुरी 312 रुपये वरून 500 रुपये करा, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे एमआरईजीएसमध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांसोबत 7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा, यासह विविध मागणीसाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार आहे. सरकार जोपर्यंत या मागण्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार बच्चू कडू व्यक्त केला आहे.
-बाईक रॅली काढून सुरवात
दरम्यान अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20 हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर अन्नत्याग आदोलनात होईल; अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यामुळे 8 तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यावर सरकार विचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे. कारण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रहारचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे.