बकरी ईदमध्ये गोवंशाचा बळी टाळण्यासाठी प्रशासन सतर्क
पर्यावरण व स्वच्छता राखण्यावरही भर

-महापालिकेत झाली आढावा बैठक
-पोलिस अधिकार्यांचीही उपस्थिती
अमरावती / 3 जून: येत्या 7 जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा साजरा होणार आहे. या सणादरम्यान कुर्बाणी देताना गोवंशाचा बळी जाउ नये याकरिता प्रशासन सतर्कता बाळगत असून या बैठकीत त्यादृष्टीने महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत गोवंश हत्याबंदी कायदा अंतर्गत बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर कुर्बानीसाठी अधिक जनावरांची तपासणी करावी, मनपा क्षेत्रातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना ईअर टॅगींग करावे, भारत पशुधन अॅपवर जनावरांच्या नोंदी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी या बैठकीत दिले.
यासोबतच बकरी ईद दरम्यान पर्यावरणाची हानी होउ नये आणि स्वच्छता राखली जावी याकरिता महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. स्वच्छततेसोबतच कुर्बानीनंतर वेस्ट मटेरियल टाकण्याकरीता प्रत्येक मस्जिदमध्ये जाऊन कंम्पोस्टेबल बॅगचे वाटप करावे, सर्व मस्जिदमध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच मुस्लिम प्रभागामध्ये नविन कंटेनर ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष पथकाची नियुक्तीही करण्यात आली. मुस्लिम बांधावांनी बकरी ईद सण हा संपूर्ण स्वच्छता राखून आणि पर्यावरण पूरक कसा साजरा करता येईल, यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी सचिन कलंत्रे यांनी यावेळी केले.
या बैठकीला पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक व इतर कर्मचारी तसेच पोलिस निरीक्षक सुनिल चव्हाण, गौतम पठारे, हनुमंत गोंडावार यांच्यासह शहरातील विविध ठाण्यांचे ठाणेदार उपस्थित होते. मुस्लिम समाजातील प्रतिनिधी मुफ्ती फिरोज व अशफाक अहेमद, नजिल खान बीके, सनाभाई ठेकेदार यांचीही उपस्थिती होती.
-मोकाट जनावरांना चिन्हित करावे
महानगरपालिका हद्दीतील पशुपालकांनी गाय, वळु, बैल, वासरे ईत्यादी मोकाट सोडलेल्या जनावरांची ओळख चिन्हित करावी. त्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या कोणत्याही चिकीत्सालयात या जनावरांना घेऊन जावे. बकरी ईद संदर्भाने सर्व मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अधिनियमानुसार कुर्बानी करीता जनावरांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले. बैठकीमध्ये मुस्लिम बांधवांनी केलेल्या सुचनांनुसार उपाययोजना करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.