ठाकरेंच्या मनोमिलनाआधीच मिठाचा खडा?
युतीच्या चर्चा ताट अन् चमचा

-देशपांडे-राउतांमध्ये रंगलय वाकयुद्ध
-उबाठा-मनसे एकत्रिकरणाला ब्रेक
मुंबई/ 22 जून: मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये द्वंद सुरू झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले होते, तसंच युतीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळल्याची चित्र होतं. मात्र, याच युतीच्या चर्चांवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरून संदीप देशपांडेंनी राऊतांवर टीकास्त्र डागलंय. ताटातल्या चमच्यांनी चमच्याचं काम करावं असा खोचक टोला देशपांडेंनी राऊतांना लगावला. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी देखील संदीप देशपांडेंना खडसावलंय.
युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तसंच राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला होता. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी संदीप देशपांडेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच मी करणार असं मोठं विधान त्यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधावरूनही संदीप देशपांडेंनी टीका केलीय. 2014 विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे भाजपसोबत का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कमालीची सकारात्मक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसंदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे मनसेकडून दुरावा निर्माण करणारी विधान सुरू असल्याची चर्चा आहे. याचं कारण आहे दोन दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेले सवाल. युतीसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतलीय. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे नेतेही सकारात्मक दिसताय. मात्र, दुसरीकडे मनसे नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.




