सरकारची इंग्रजांपेक्षा भयंकर दादागिरी
रविकांत तुपकर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

*‘शेतकर्यांचे अस्तित्व संपवण्याचा आरोप
अमरावती /11 जून: महाराष्ट्रातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, असे खुद्द एका कॅबिनेट मंत्र्याने विधानसभेच्या सभागृहात सांगितले होते. मात्र, या राज्यातील सरकार शेतकर्यांचे अस्तित्व, चळवळ संपवण्याच्या दिशेने निघालेले आहे. इंग्रंजांपेक्षा भयंकर दादागिरी आणि दहशतीचे काम हे सरकार करत आहे. इंग्रज किमान ओळखू येत होते. मात्र, हे आपल्या सारखेच दिसतात. आपल्यात आले की आपल्या सारखे बोलतात, तिकडे गेले की त्यांच्या सारखे वागतात. शत्रू नेमका कोण हे आपल्याला समजेनासे झाले आहे. बळीराजा जर आत्महत्या करतोय, गळफास करतोय आणि हे सरकार काही करायला तयार नाही, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरूकुंज मोझरी येथे बोलताना केली. शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे मोझरी येथे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुती सरकारवर जोरदार टीका केली.तुपकर म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असून सरकार मात्र, महापालिका कशा हातात येतील, याकडे लक्ष देत आहे. शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी, शेतमजुर व दिनदलितांच्या हक्कासाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चार दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे.आमचा कुणी वाली नाही, आमची बाजू मांडणारा आमच्यासाठी कुणी बोलणारा नाही, अशी भावना शेतकर्यांची झाली होती. मात्र, अशावेळी बच्चू कडूंनी आंदोलनाच्या माध्यमातून एक आशेचा किरण शेतकर्यांसाठी उभा केला. सर्वात कठीण आंदोलन कोणते असेल तर उपोषण आणि अन्नत्याग हे आंदोलन आहे. बच्चू कडू यांनी हा अन्नत्याग आंदोलनाचा कठीण मार्ग स्वीकारला असल्याचे तुपकर यांनी सांगितले.