शेतकर्‍याने विष प्राशन करून जीवन संपविले

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या, नांदगावपेठची घटना

नांदगाव पेठ/ 25 जुलै  : एकीकडे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा आणि चक्काजाम आंदोलन सुरु असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे एका शेतकर्‍याने कर्जाच्या ओझ्याने कंटाळून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विनोद भाऊरावजी सावरकर (वय 54) असे आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकर्‍याचे नाव आहे. समोर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने आणि मजुरांना द्यायला सुद्धा पैसे नसल्यामुळे विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाउल उचलल्याचे बोलले जात आहे.
शेतकरी विनोद सावरकर यांच्याकडे स्वतःची चार एकर शेती असून त्यांनी त्याच परिसरात चार एकर शेती लागवणने घेतली होती. मात्र सततची नापिकी, खर्चाचे वाढलेले प्रमाण, मजुरांची मजुरी देण्यासाठी असलेली आर्थिक अडचण आणि कर्जाचा डोंगर अशा संकटांच्या गर्तेत ते सापडले होते. त्यांच्यावर सुमारे दोन लाखांचे कर्ज होते. 23 जुलै रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांना याबाबत माहिती होताच त्यांनी विनोद सावरकर यांना अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान 24 जुलै रोजी सकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले.
विनोद सावरकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे नांदगाव पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यभरात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले होते. शासनाने तातडीने व्यापक कर्जमाफी घोषित करावी, या मागणीसाठी प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पण दुसर्‍याच बाजूला एका शेतकर्‍याचा कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत मृत्यू झाला, ही घटना व्यवस्थेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभं करणारी ठरत आहे. गुरुवारी दुपारी विनोद सावरकर यांच्या मृतदेहावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button