बीजूधावडीत वाळु माफियांचा हैदोस, ढाबा पेटविला
कुटुंबाला मारहाण, वाहनांना लावली आग

-35 लाखांचे साहित्य भस्मसात
धारणी / 17 जून: वाळु तस्करीची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयावरुन 5 वाळु माफियांनी एका ढाबा मालकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने ढाब्यावर हल्ला चढविला. त्यांनी ढाब्यावर चांगलाच हैदोस घातला. ढाबा मालकाची पत्नी व मुलासह कुटुंबियांना त्यांनी मारहाण केली व ढाब्याला तसेच समोर उभ्या असलेल्या कार व दुचाकीला त्यांनी आग लावली. त्यात ढाबा मालकाचे तब्बल 35 लक्ष रुपयांचे नूकसान झाले आहे. धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावर बीजूधावडी ते अकोट रोडवर असलेल्या मामा का ढाबा येथे ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून येथील रहिवाशांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार विजूधावडी ते गडगामालूर दरम्यान एका ठिकाणी शिरपूर येथील रहिवासी असलेल्या श्रीकांत जयस्वाल यांनी सात वर्षा आधी मामा का ढाबा सुरू केला आहे. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाह चालतो. सर्व सुरळीत सुरू असताना परिसरातील गडगा मालूर येथील काही युवकासोबत श्रीकांत जयस्वाल यांचा वाद निर्माण झाला. आरोपी हे वाळु माफिया असून श्रीकांत जयस्वाल हे आपल्या अवैध तस्करीची माहिती पोलिसांना देतात, असा त्यांना संशय होता. त्यातूनच सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी रात्री घटनेच्या वेळी श्रीकांत जयस्वाल हे घरी नव्हते. त्याची पत्नी व लहान मुलगा मागच्या खोलीत होते. त्याचवेळी गडगा मालूर येथील गजानन पाटील, पवन पाटील, उत्तम पाटील, बाळा पाटील, राजा पाटील हे पाच जण ढाब्यावर पोहोचले. त्यांनी श्रीकांत जयस्वल कोठे आहे, अशी विचारणा करुन शिवीगाह करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी श्रीकांत जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलाला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ढाब्याच्या चोहिबाजूनी पेट्रोल टाकून आग लावली. ढाब्यासमोर उभी असलेली कार आणि मोपेड सुद्धा पेटवून दिली. दरम्यान ढाब्यावर असलेले सिलेंडर आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने स्फोट झाला आणि संपूर्ण ढाबा जाळून खाक झाला.
या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. ढाब्यावरील ग्राहकांमध्येही दहशत निर्माण होवून त्यांना पळ काढावा लागला. घटनेत अंदाजे 35 लाख रुपयांचे नूकसान झाले. घटना घडली त्यावेळी ढाब्यावर दोन पोलिस हजर होते. त्यांनी अग्नीशमन दल व धारणी पोलिसांना माहिती दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझविली. याबाबत श्रीकांत जयस्वाल यांनी धारणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी पाचही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश झालटे करीत आहेत.