निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्या

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती /9 डिसेंबर : निम्न पेढी प्रकल्प प्राधान्यक्रमात आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निम्न पेढी प्रकल्पातील बाधित पाच गावांचे भुसंपादन करण्यात आले आहे. आता बाधित गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाला वेग द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. निम्न पेढी प्रकल्पाच्या कामाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह बाधित पाच गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निम्नपेढी प्रकल्पात हातुर्णा, गोपगव्हाण, कुंड खुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर या गावातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांत राहणार्‍या नागरिकांना पुनर्वसित गावात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. पुनर्वसित गावात प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी पुनर्वसित गावात नागरी सुविधा पुर्ण करण्यात याव्यात. स्थलांतर णासाठी दोन लाख रूपयांची प्रती कुटुंबाला मदत करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना सरपंचांच्या सहायाने माहिती देण्यात यावे. गावात राहत नसलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यात यावा. त्यांची सहमती घेऊन स्थलांतरासाठी देण्यात येणारा भत्ता देण्यात यावा. बाधित गावातील कुटुंबाची मागणी असल्यास त्यांना घरकुल मंजुर करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे हप्ते देण्यात येणार आहे. गावातील पाणी, वीज, नाल्या आणि इतर सुविधांसाठी 57 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. याचा योग्य विनियोग होण्यासाठी गावकर्‍यांची मदत घेतली जाणार आहे. पुनर्वसित गावात पाण्याची समस्या येवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. पाणीपुरवठा आणि अंगणवाडी या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button