‘वाट्टेल त्यांना पक्षात घेता आणि शुचितेच्या गप्पा मारता’
राज ठाकरेंनी घंतला भाजपचा समाचार

-टोकदार शब्दात अक्षरश: बोचकारले
मुंबई / 18 जुलै : विधिमंडळाच्या आवारात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यामुळे विधिमंडळाच्या संकेत आणि परंपरा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात राज्यभर महाराष्ट्राची मान खाली गेली, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर सुरू असलेल्या पक्षांतराच्या आणि ऑपरेशन लोटस या घटनांचा समाचार घेतला आहे. अतिशय टोकदार शब्दांनी त्यांनी भाजपला अक्षरशः बोचकारले, असेच म्हणता येईल.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर याचा सविस्तर उल्लेख केला आहे. विधिमंडळाच्या आवारात झालेल्या गोंधळाच्या चित्रफिती मी पाहिल्या. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या समर्थकांत झालेली हाणामारी खेदजनक आहे. ते पाहून वाटले, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच बोचकारले आहे. सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचे. पक्षात घेतलेल्या या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनसूचीतेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असे मी मानतो. मी तर आता मराठी जनतेलाच विचारेन की, कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र!
मराठी भाषेचा अपमान झाला, मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर तुटून पडणारे आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. मराठी भाषेच्या किंवा संस्कृतीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र सैनिक त्यावर तुटून पडतो,याचा मला अभिमान आहे, असे नुकत्याच झालेल्या मराठी भाषेच्या आंदोलनावरील प्रतिक्रियांचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी मनसेच्या दिवंगत आमदाराचा आवर्जून उल्लेख केला. मनसेच्या आमदाराने एका मुजोर आमदाराला दणका दिला होता. मात्र तो कोणत्याही वैयक्तिक द्वेषातून नव्हे तर मराठीला कमी लेखण्यामुळे दिला होता. वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी आणि आमदारांच्या व त्यांच्या समर्थकांच्या कृत्यांबाबत सामान्य जनतेत अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया गेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या एका दिवसाच्या कामकाजावर सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च होतो. हे कोट्यावधी रुपये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या व्यक्तिगत शेरेबाजीवर खर्च करायचे का?. हे असेच सुरू राहिले तर उद्या विधानभवनात खून पडले तर विशेष वाटू नये, असेही राज ठाकरे म्हणाले.
एकंदरच काल विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या समर्थकांनी जी हाणामारी केली त्यावर सर्वच राजकीय पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. मात्र त्यापासून बोध घेऊन सुधारणा होणार की पुन्हा एकदा पक्षी अभिनवेश बाळगून वादाचा नवा अंक सुरू होणार, हा सबंध महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे.




