मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, कर्फ्यू, इंटरनेट सेवा बंद

राज्यपालांसोबत झालेली बैठकी नंतर निर्णय

इंफाळ /8 जून– मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली असून, इंफाळ खोर्‍यातील पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, राज्यात पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ’अरंबाई टेंगोले’ या मेईतेई संघटनेच्या पाच नेत्यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यभरात हिंसक निदर्शने उसळली असून, त्यानंतर प्रशासनाने कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्शभूमीवर मणिपूरमधील 25 आमदार आणि एक खासदार यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन अटक करण्यात आलेल्या अरंबाई टेंगोले नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली.भाजप आमदार खोन इबोमचा यांनी माहिती देताना सांगितले की, कालच्या घटनेच्या पोर्शभूमीवर आम्ही राज्यपालांची भेट घेतली. अटक करण्यात आलेल्या नेत्यांची मुक्तता करण्याची विनंती केली. राज्यपालांनी स्पष्ट केले की, सरकार अरंबाई टेंगोले संघटनेच्या विरोधात नाही. नुकत्याच झालेल्या पुराच्या काळातही या संघटनेच्या मदतीला सरकारने पाठिंबा दिला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी कानन सिंग यांच्याविरोधात सीबीआयकडून खटला सुरु असून त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. उर्वरित चार जण त्यांच्यासोबत होते म्हणून त्यांनाही ताब्यात घेतले गेले. त्यांची पोलीस चौकशी सुरु असून दोषमुक्त आढळल्यास त्यांची सुटका केली जाईल, असेही आमदार इबोमचा यांनी स्पष्ट केले.दरम्यान, काँग्रेस आमदार ओकराम सुरजाकुमार यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, अरंबाई टेंगोले नेत्यांच्या अटकेमुळे संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे आणि इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने अशा परिस्थितीत पारदर्शकता ठेवावी आणि अटकेचे कारण स्पष्ट करावे. राज्यात पुन्हा एकदा अस्थैर्य निर्माण झाले असून, सामान्य जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधींची राज्यपालांसोबत झालेली बैठक आणि त्यात मांडलेली मागणी या घडामोडींना पुढील दिशा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button