भारतीय जनता पार्टीकडून अचलपूर नगरपरिषदेला धारेवर
कचरा ठेकेदारांच्या कामकाजात अनियमितता, कर्मचार्यांचे रोखीने वेतन

*पाणीटंचाईसह अनेक मुद्यांवर भाजपा शहराध्यक्ष कुंदन यादव यांचे निवेदन
अचलपूर /11 जून: अचलपूर शहरातील नगरपरिषद प्रशासनाविरोधात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कुंदन यादव यांनी थेट मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत कडक आक्षेप नोंदवले. कचरा संकलन करणार्या ठेकेदारांच्या कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव, कर्मचार्यांचे बँक खात्यात न देता रोख स्वरूपात वेतन देणे, कामगारांच्या भविष्य निधीबाबत प्रश्नचिन्ह, तसेच शहरातील पाणीपुरवठा आणि अतिक्रमण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली. शहरातील स्वच्छता कामगारांना मासिक वेतन रोख स्वरूपात देण्यात येत असून, त्यामुळे भविष्यात कर्मचारी आर्थिक फसवणुकीचा बळी ठरू शकतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय तीन महिला कर्मचार्यांनी आपल्याला अचलपूर नगरपरिषद कार्यालयात येऊन शपथपूर्वक दिलेल्या जबाबांमध्ये त्यांचे पगार वेळेवर न मिळणे आणि कोणतेही फायदे न मिळणे असे गंभीर आरोप केले आहेत. यावरून कचरा ठेकेदारांची आर्थिक व्यवहार पद्धत संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते. अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरांतील अनेक भागांमध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. यासंदर्भात कुंदन यादव यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी धीरज कुमार गहाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. , विलायतपुरा, परिसर याठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी साफ न होणे, पाईपलाईनमध्ये अडथळे निर्माण होणे यासंबंधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.हिरापूर येथील सरकारी जमिनीवर झालेले अतिक्रमण, चौधरी मैदान परिसरात सार्वजनिक जागेच्या वापराबाबत, तसेच उपजिल्हा रुग्णालयाजवळील अतिक्रमण बाबत देखील प्रशासनाच्या दुर्लक्षावर ताशेरे ओढण्यात आले. नगरपरिषदकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.कचरा संकलन करणार्या ठेकेदाराकडून कामगारांचे शोषण होत असताना आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नसल्यानंतर देखील त्यांचे बिले मंजूर करून देणे अयोग्य असल्याचे मत निवेदनात नोंदवले गेले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिले थांबवावीत आणि त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ज्या कंपनीने कामगारांचे हक्क डावलले, त्यांच्याशी भविष्यात कोणतेही शासकीय व्यवहार होऊ नयेत म्हणून त्या कंपनीचा समावेश नगरपरिषदेच्या ब्लॅकलिस्टमध्ये करावा, अशी स्पष्ट भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. शहरातील सामान्य नागरिक, सफाई कामगार आणि पाण्यासारख्या मूलभूत सेवांमध्ये प्रशासनाने जे दुर्लक्ष केले आहे, ते खपवून घेता येणार नाही. जबाबदार अधिकार्यांवर कारवाई व्हावी आणि नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवले जावेत, हीच आमची भूमिका आहे, असे कुंदन यादव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.