पाण्याच्या टाकीचा स्फोट; सहा कामगारांचा मृत्यू

नऊ जखमी; नागपूर बुटीबोरी एमआयडीसीतील खळबळजनक घटना

नागपूर /19 डिसेंबर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी एक भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. येथील अवाडा कंपनीच्या प्रकल्पस्थळी उभारण्यात येत असलेला उंच टँक टॉवर अचानक कोसळल्याने सहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर नऊ कामगार जखमी झाले आहेत. यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे 11.15 ते 11.30 दरम्यान बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन एमआयडीसी परिसरात घडली. अवाडा कंपनीमध्ये उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या टँक टॉवरचा अचानक स्फोट होऊन संपूर्ण संरचना कोसळली. मोठ्या आवाजासह टॉवर जमीनदोस्त झाल्याने परिसरात धूळ आणि मलब्याचे ढग पसरले आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांमध्ये अरविंद कुमार ठाकुर (28), अशोक कंचन पटेल (42), अजय राजेश्वर पासवान (26), सुधांशु कुमार नागेश्वर साहणी (36), बुलेट कुमार इंद्रजित षहा (30) आणि शमिम अन्सारी (42) यांचा समावेश आहे. सर्व मृत मजूर हे बिहार राज्यातील विविध जिल्ह्यांतील रहिवासी होते. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांमध्ये प्रकाश बुल्ला साहनी, अन्वर अन्सारी आणि मुफ्तार अन्सारी यांचा समावेश आहे. तसेच बाबुचंद प्रसाद, जाकीर शहनवाज हुसेन, इब्रहिम नयीम अन्सारी, मयुरी रविंद्र तुरक, विकास कुमार पप्पु सहानी आणि संतोष दुधनाथ गौतम हे कामगार जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने बुटीबोरी येथील माया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अवाडा कंपनीत सौर पॅनल निर्मिती आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांचे काम सुरू होते. टँक टॉवरचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना त्याचा समतोल बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामातील निष्काळजीपणा, तांत्रिक त्रुटी किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का? याचा सखोल तपास करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button