मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा, काँग्रेसला धक्का

पराभूत उमेदवारांच्या याचिका कोर्टानं फेटाळल्या

-निवडणूक निकालाला दिले होते आव्हान
नागपूर / 4 जुलै: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच प्रफुल गुडधे यांना मुंबई हायकोर्टानं मोठा धक्का दिला आहे. त्यांच्यासह दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुगंटीवार यांच्या विरोधात लढणारे संतोषसिंह रावत, सुभाष धोटे या सर्व काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत.
ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटीफिकेशन काढले नाही असा दावा करून या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात याचिका दाखल करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. यासोबतच निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्हीचे फुटेज देण्याचीही मागणी त्यांनी केली होती. निवडणुकीसंदर्भात याचिका दाखल करताना दिवाणी संहितेमधील सातव्या निकालातील नियम 11 चा आधार घेत याचिकाकर्ते न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे, या नियमाचा दाखला देऊन या याचिका फेटाळण्यात याव्या असा युक्तीवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी केला होता. या याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलमानुसार निकष पूर्ण करीत नाही, असेही मत त्यांनी न्यायलयात मांडले. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रफुल गुडधे लढले होते. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मते यांच्या विरोधात गिरीश पांडव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातून विजयी झालेले बंटी भांगडिया यांच्याविरुद्ध सतीश वारजुरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंह रावत आणि राजुरा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे यांनीही निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिका दाखल करताना हे सर्व उमेदवार न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या वकिलामार्फत याचिका दाखल केल्या होत्या.
प्रफुल गुडधे यांनी याचिका दाखल करण्यासदंर्भात सर्व प्रक्रिया करताना आपण न्यायालयात उपस्थित होतो, असा दावा केला होता. दुसर्‍या दिवशी काँग्रेसच्या एका बैठकीसाठी दिल्लीला जावे लागले, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रातील निवडणुकीत मॅचफिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सुमारे 33 हजार मतांची वाढ झाल्याचा दावा करून मतदार नोंदणीची सर्व प्रक्रिया संशयास्पद असल्याचा दावा केला होता.
गुडधे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा दावा करताना एकच फोन नंबरवरून 40 ते 100 मतदारांची नोंदणी करण्यात आली. अधिकार्‍यांनी यावर कुठलाच आक्षेप घेतला नाही. त्यांची पडताळणी केली नाही. नियमानुसार घरोघरी जाऊन खातरजमा केली नाही, असा आरोप केला होता. आपल्या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिकाच फोटाळून लावल्याने गुडधे यांच्यासह काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button