दुचाकी अपघातात माय-लेकीचा मृत्यू

निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जिवघेणा

राजुरा /9 जून– बल्लारपूर-राजुरादरम्यान निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील तरुणी व तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 9 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, परिसरातील नागरिकांत राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यावर तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा येथील पेठ वार्डातील ज्योती बंडू रागीट (42) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट या दोघीही एमएच 34, बीएन 5538 क्रमांकाच्या दुचाकीने राजुरा येथून बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पूल ओलांडल्यावर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेकी जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बामणी-राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरिता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या ढिगार्यावरील माती रस्त्यावर येत आहे पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून, वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button