‘सातबारा कोरा करा’ अन्यथा नेपाळ सारखे घरात घुस

बच्चू कडू कडाडले,

* शेतमालाला योग्य भाव द्या

चंद्रपूर /24 सप्टेंबर : शेतमालाच्या भावावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘शेतकर्‍यांची लूट थांबवा’ आणि ‘सातबारा कोरा करा’, अन्यथा नेपाळ सारखे घरात घुसू, असा इशारा शेतकरी नेते बच्चू कडू यांनी खांबाडा येथील शेतकरी आंदोलनात दिला. वरोरा तालुक्यातील खांबाडा चौकात शेतकर्‍यांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलन करून चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतुक अर्धा तास रोखून धरली. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होवून आंदोलनाला चालना दिली. या आंदोलनादरम्यान ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, ‘बच्चू भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत शेतकरी सरकारचा निषेध नोंदविला. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी शेतकर्‍यांच्या समस्या ऐकल्यावर शेतकर्‍यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव देवाभाऊ आहे, पण त्यांची करणी रावणाची आहे, झेंडा कोणताही असो, कापड मात्र शेतकरीच पिकवतो, असे सांगितले. रोपटे उंच वाढलेली असूनही, हंगाम संपल्यावरदेखील झाडे शेंगांविना रिकामीच आहेत. शासकीय धोरणे चुकीची असल्याने शेती व्यवसाय तोट्यात आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. मोदी सरकारवर टीका करताना आठ वर्ष जनतेची लूट केल्यावर जीएसटी कर कमी केला; अशा परिस्थितीत भारतात नेपाळसारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. या आंदोलनात शेतकर्‍यांच्या मुख्य मागणी म्हणून सरसकट कर्जमाफी, ज्या शेतकर्‍यांनी सरसकट विमा काढला आहे त्या पिकांसाठी सरसकट पीक विमा लागू करावा, शेतमजुरांचे प्रश्न, दिव्यांगांसाठी 6,000 रुपये मासिक मानधन यांचा समावेश होता. तसेच कापूस व सोयाबीनसारख्या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करण्याची मागणी किशोर डुकरे यांनी केली होती. शेतकर्‍यांनी खराब झालेले सोयाबीनचे पीक हातात घेऊन आंदोलन उभारले होते. आजारपणामुळे घरची जनावरे विकावी लागतात, शेणखताला सबसिडी द्यावी अशीही मागणी करत कडू यांनी शेतकर्‍यांच्या बर्‍याच प्रश्नांना वाचा फोडली. या आंदोलनात शेतकर्‍यांचे निवेदन नायब तहसीलदार लोखंडे यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते एकनाथ शिंदे गट यांचीही कार्यक्रमात उपस्थिती होती. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. अंदाजे दोन हजारांहून अधिक शेतकरी यात हजर होते. यानंतर त्यांनी माढेळी येथे ‘शेतकरी हक्क परिषद’ आणि सिंदेवाही तालुक्यातील पाथरी येथे भव्य जाहीर सभेला हजेरी लावली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button