कुंभमेळा : नाशिकला जोडणार्या महमार्गांचा विकास होणार
गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरात बैठक

नागपूर / 22 जून: दोन वर्षाने नाशिकला होणार्या कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वरला जोडणारे सर्व प्रमुख महामार्ग व अन्य रस्त्यांचा जलद विकास करण्याचा निर्णय रविवारी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला.2027 मध्ये नाशिकमध्ये होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणार्या रस्त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या नियमनासाठी आयोजित बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे मंत्री व कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री श्री गिरीशजी महाजन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजेजी भोसले तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
दर 12 वर्षांनी होणार्या कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक एकत्र येतात. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या यात्रेकरूंसाठी सुरळीत वाहतूक आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मजबूत आणि कार्यक्षम रस्ते व पायाभूत सुविधा असाव्या, असे मत बैठकीत सहभागी नेत्यांनी व मंत्र्यांनी मांडले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह जवळच्या शिर्डी आणि शनि शिंगणापूरसारख्या तीर्थक्षेत्रांनाही मोठ्या संख्येने भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला लागून असलेले महामार्ग, नाशिकला जोडणार्या महामार्गांचा विकास करण्याचा निर्णय बैठकीत झाला. यामध्ये विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन बायपास बांधणे आणि पर्यटकांच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणे या बाबींचा समावेश आहे.




