शेतकर्‍यांआडून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न

आ.रवी राणांचा बच्चू कडूंवर घणाघात

* शिंदे सेनेत पुनर्वसन होणार असल्याचा दावा

* विविध ठिकाणी मालमत्ता असल्याचा आरोप

नागपूर/7 नोव्हेंबर – बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन हे शेतकर्‍यांसाठी नसून स्वतःचं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी केलं आहे, असा घणाघात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राणा यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांच्या नावाखाली केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण दिलं. नागपुरात चक्का जाम केला आणि त्यामुळे कोर्टाने त्यांच्या या कृतीवर ताशेरे ओढले. न्यायालयाने अशा आंदोलनाचा निषेध केला आहे. सरकार, मुख्यमंत्री आणि न्यायालय तिघेही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. मात्र बच्चू कडू यांनी स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शेतकर्‍यांचा सहारा घेतला. राणा पुढे म्हणाले की, हे आंदोलन शेतकर्‍यांच्या हितासाठी नसून शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीसाठी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू यांची झालेली बैठक ही त्याचाच भाग आहे. येत्या काळात
बच्चू कडू यांचं शिंदे सेनेत राजकीय पुनर्वसन निश्चितपणे दिसेल.
ते म्हणाले की, बच्चू कडू हे पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्री होते. त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न का मांडले नाहीत? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही ते मंत्री होते, तरी त्यांनी शेतकर्‍यांसाठी काही केलं नाही. मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता शेतकर्‍यांच्या नावाखाली आंदोलन करत आहेत. सरकारने शेतकर्‍यांसाठी 32 हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना अडचणीत आण्यासाठी नाही तर आपले राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शेतकर्‍यांना हाताशी धरून शेतकर्‍यांची फसवणूक केली आणि एकनाथ शिंदे यांचा सोबत बच्चू कडू यांची वीस मिनिटांची बैठक याचं सार्थक एवढाच आहे की, येणार्‍या काळामध्ये बच्चू कडूचे शिंदेसेने मध्ये पुनर्वसन होणार. असेही आमदार रवी राणा म्हणाले.बच्चू कडू यांच्या मालमत्तेबाबतही राणा यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या घराचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, तो बघून कोणताही शेतकरी चकित होईल. 75 एकरामध्ये हवाई महालासारखं घर, सर्व आधुनिक सुविधा असणं, आणि मुंबई, पुणे, नाशिक, यवतमाळ, अमरावती अशा ठिकाणी मालमत्ता असणं हे एका सामान्य शेतकर्‍याचं आयुष्य नाही. ही संपत्ती त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून आणि दबाव निर्माण करून जमवली आहे, असा आरोप राणा यांनी केला. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे बच्चू कडू यांच्या या सर्व मालमत्तेची माहिती जमा झाली आहे. लवकरच अवैध संपत्तीबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. बच्चू कडू हे शेतकर्‍यांचे खरे हितचिंतक नसून, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शेतकर्‍यांच्या भावनांचा वापर करणारे नेते आहेत. अशी आमदार रवी राणा म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button