छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवादी ठार; 3 जवान शहीद
सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्रे जप्त

नागपूर /3 डिसेंबर : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एकीकडे नक्षलमुक्त भारत अभियान सुरू केले असून महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे समर्पण करुन घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या उपस्थितीत नक्षल वाद्यांचा कमांडो आणि मोठं बक्षीस असलेल्या नेत्याने संविधान हाती घेत नक्षल चळवळीला रामराम ठोकला. देवेंद्र फडणवीस यांनीही नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने पाऊल टाकलं आहे. मात्र, अद्यापही छत्तीसगडमध्ये नक्षलवादी, माओवाद्यांच्या कारवाया सुरूच असल्याचं दिसन येतं. आज सकाळपासूनच छत्तीसडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून 3 जवानही शहीद झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलांचे 3 जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमारेषेवर पश्चिम बस्तर डिव्हिजन क्षेत्रात छत्तीसगड पोलिसांचे डीआरजी पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. सायंकाळपर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र, डीआरजीचे तीन जवान ही या चकमकीत शहीद झाले आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे जवान अधिक सतर्क झाले असून विजापूर जिल्हा मुख्यालयातून रिइनफोर्समेंट पाठवण्यात आले आहे. आतापर्यंतचे सर्च ऑपरेशनमध्ये घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या अनेक एसएलआर आणि इंसास रायफल तसेच थ्री नॉट थ्री बंदुका सुरक्षा दलाने जप्त केल्या आहेत. दरम्यान, नक्षलावद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांमध्ये मोनू वडाळी, दुकारु गोंडे आणि रमेश सोडी या तिघांचा समावेश आहे.




