बेपत्ता तीन अल्पवयीन मुलींना पाच तासांत शोधले
मोर्शी पोलिसांची कामगिरी

-अकोल्यातून घेतले ताब्यात
मोर्शी / 6 जून: मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथून दोन सख्ख्या बहिणींसह तीन अल्पवयीन मुली 4 जून रोजी अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. याबाबत गुरुवारी तक्रार दाखल झाल्यानंरत मोर्शी पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाची सूत्रे हलवून अवघ्या चार ते पाच तासांत या मुलींचा शोध लावला. तिन्ही मुलींना अकोला येथून ताब्यात घेउन कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
प्राप्त माहितीनुसार तळेगाव श्यामजीपंत येथील रहिवासी असलेल्या भारती सुनील राऊत यांनी 5 जून रोजी मोर्शी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या दोन अल्पवयीन मुली मोर्शीपासून जवळच असलेल्या ग्राम मायवाडी येथे त्यांच्या बहिणीकडे म्हणजेच मुलींच्या मावशीकडे आल्या होत्या. मात्र गुरुवारी, 4 जून रोजी या त्यांच्या दोन्ही मुली आणि त्यांच्या बहिणीची एक मुलगी अशा तीघी अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. एका महिला नातेवाईकांसोबत दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्या तिघी मोर्शी येथे नाश्ता करण्यासाठी गेल्या होत्या. त्या दुपारी 3 वाजेपर्यंत घरी परत आल्या नाही, असे तक्रारीत म्हटले होते. शुक्रवारी, 5 जून रोजी सकाळी 11 वाजता याबाबत तक्रार दाखल झाली.
कुटुंबियांनी सर्व नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. घटना गंभीर असल्याने मोर्शी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. मोर्शी येथे या मुली जेथे गेल्या होत्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि मोबाईलच्या लोकेशनवरुन शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या मुली अकोला येथे त्यांच्या नातेवाईकाकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना घेण्यासाठी मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, महिला पोलीस लता थोटे यांच्यासह पोलिस पथक अकोला येथे रवाना झाले. या तिन्ही मुलींना पोलीस स्टेशन मोर्शी येथे आणून आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर अल्पवयीन मुलींनी आपल्या नातेवाईकांकडे अकोला जात असल्याचे सांगितले नसल्यामुळे त्यांचे आई-वडिलांना व पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.