वादळी वार्‍याचा शेतीला फटका, खासदारांकडून पाहणी

नूकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी

-जिल्हाधिकार्‍यांसोबत केली चर्चा
अमरावती /16 जून: अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वार्‍यांसह पावसाचा जोर कायम असून त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार आदी तालुक्यांतील केळी, संत्री, निंबू व कांद्याच्या पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी विविध भागात प्रत्यक्ष शेतात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत देण्याची मागणी बळवंत वानखडे यांनी केली आहे.
पाहणीनंतर वानखडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली. नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खासदार बळवंत वानखडे यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले की, हवामानातील अचानक बदल आणि जोरदार वादळी वार्‍यांमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. केळीच्या बागा उध्वस्त झाल्या असून संत्रा, निंबू व कांद्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. अनेक शेतकरी कर्जावर अवलंबून आहेत.
अशा वेळी त्यांना आर्थिक भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावात तात्काळ पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यास आणि सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यास वानखडे यांनी सांगितले. सरकारनेही शेतकर्‍यांना या कठिण प्रसंगात दिलासा देण्यासाठी विनाविलंब आर्थिक सहकार्य करण्याची आग्रही मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button