नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला 1117 कोटींचा मदतनिधी

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश

अमरावती /30 ऑक्टोबर : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी 570 कोटी आणि शासनाने मदतीचा निकष दोन हेक्टरवरून तीन हेक्टर मर्यादा वाढ केल्यामुळे 547 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला हा निधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र शासकीय निर्णय जाहीर झाले आहे. अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील 4 लाख 90 हजार 911 शेतकर्‍यांची 4 लाख 81 हजार 503 हेक्टर जमीन बाधीत झाली होती. यासाठी 490 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरवरून तीन हेक्टर मर्यादा वाढ केल्यामुळे 55 हजार 212 शेतकर्‍यांना 66 हजार 373 हेक्टरसाठी 79 कोटी रूपयांचा निधी प्राप्त होईल. राज्यातील विविध जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर यामुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता विशेष मदत देण्यात येणार आहे. यात सप्टेंबर 2025 मधील कालावधीमध्ये 4 लाख 90 हजार 911 शेतकर्‍यांची 5 लाख 47 हजार876 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी जिल्ह्याला 547 कोटी रूपयांची मदत मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना येत्या रब्बी हंगामामध्ये 10 हजार रूपये प्रति हेक्टरी मदत, अर्थसहाय देण्याचा निर्णय 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आहे. ही मदत 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी तातडीने प्रस्ताव सादर केले. त्यानुसार आज जाहिर झालेल्या दोन शासन निर्णयामध्ये नुकसानीपोटी जाहिर झालेली मदत आणि रब्बी हंगामाकरीता देण्यात येणारी विशेष मदतमध्ये राज्यातून एकमात्र अमरावती जिल्ह्याला मदत जाहिर झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button