बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचा पाठींबा

दुसर्‍या दिवशी आंदोलन स्थळाला दिली भेट

* केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका

*रोहीत पवार व जकारिया फाउंडेशन यांचेही समर्थन

*मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला मोठी गर्दी

गुरूकूंज मोझरी/9 जून:शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बोलताना राकेश टिकैत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. राकेश टिकैत म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सरकारची नाकेबंदी केली. अजूनही आमचा संघर्ष सुरूच आहे. पण, सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट फाडण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपने अनेक राज्यांत राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण केले. महाराष्ट्रातही वर्चस्व ठेवून असलेल्या मोठ्या पक्षात फूट पाडली. आम्ही शेतकर्‍यांची विचारधारा मानणारे लोक आहोत. आमची लढाई ही विचारधारेची आहे. सरकार धर्म, जातीच्या मुद्यावर फूट पाडण्याचा, शेतकरी संघटनांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण आपल्याला शेतकर्‍यांची  चळवळ पुढे न्यावी लागणार आहे. आता देशात वैचारिक क्रांती होणार आहे. भाजपचे सरकार हे भांडवलदारांना फायदा  पोहचविण्यासाठी काम करीत आहे. आदिवासींच्या जमिनी कवडीमोल किंमतीत उद्योगपतींना दिल्या जात आहेत. शेतकर्‍यांकडून सरकारतर्फे जमिनी खरेदी केल्या जातात, पण त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. आता शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी अजिबात विकू नये, असा सल्ला टिकैत यांनी दिला. महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या संघटना कमकुवत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, असे टिकैत म्हणाले. देशात धार्मिक सद्भाव बिघडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक राज्यांमध्ये जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. शेतकरी एकत्रच येऊ नये, असा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका टिकैत यांनी केली.रोहीत पवार व जकारिया फाउंडेशन यांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा देत समर्थन जाहीर केले आहे.बच्चू कडू यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, गेली पंधरा वर्षे भाजपचे सरकार देशात आहे. तरीही ‘हिंदू खतरे मे है’ असे भाजपचे लोक म्हणतात. एवढ्या वर्षांत सत्ताधारी लोकांनी मग काय केले, हा प्रश्न निर्माण होतो. जाती-धर्माचे प्रश्न निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्य विषयांपासून लोकांना दूर नेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका कडू यांनी केली. केवळ दिव्यांगांचे मंत्रालय व्हावे, या एकमेव प्रामाणिक इच्छेतून आपण सरकारमध्ये सहभागी झालो होतो, दुसरे कोणतेही कारण नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button