प्रहार कार्यकर्त्यांचा टोल नाक्यावर चक्काजाम

बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस

*टायर जाळले, शासनाचा केला निषेध

नांदगाव पेठ/12 जून : शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी गुरुकुंज मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी 8 जूनपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आज पाचव्या दिवशी तीव्र प्रतिक्रिया उमटली. शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र संताप व्यक्त करत प्रहार कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय महामार्गावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळुन शासनाच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.पोलीस यंत्रणेला घटनास्थळी धाव घ्यावी लागली. नांदगाव पेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत चोख कायदेशीर कारवाई केली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांनी या प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मंगेश बबनराव देशमुख (वय 47, रा. वणी, बेलखेड) यांच्यासह आशिष भेटाळू (रा. रसुलापूर ), अजय राऊत (रा. शिरजगाव कसबा), सतीश कीटूकले (रा. फुबगाव), प्रदीप बंड (रा. जसापूर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 126(2), 189(2), 223(ब), 280, 287, 135 अन्वये बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाच दिवस उलटूनही शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने राज्यातील प्रहार कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रतिसाद व पाठिंबा यामुळे हे आंदोलन आता जनआंदोलन होत आहे. परंतु शासनाने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातील प्रहार कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून यावर लवकर तोडगा निघाला नाही राज्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष!

संबंधित बातम्या

Back to top button