12 तासांत खुनाचा उलगडा; यवतमाळमधून आरोपी अटक
दारूच्या नशेत क्षुल्लक वादातून केली मित्राची हत्या

* गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाइ
नांदगावपेठ/19 ऑक्टोबर : नांदगावपेठ पोलीस ठाणे हद्दीतील रामगाव शेतशिवारात शनिवारी घडलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा अवघ्या 12 तासांत करून अमरावती शहर गुन्हे शाखेने आपल्या तपासकौशल्याचा ठसा उमटविला आहे. या प्रकरणात फारुख खान शमशेर खान उर्फ शाहरूख ब्लॅक (वय 32, रा. अकबर नगर, अमरावती) या आरोपीस यवतमाळ येथील भोसा रोडवरील सासरवाडीतून अटक करण्यात आली.
शुक्रवारी रात्री सैयद शाहरूख सैयद फारुख (वय 34, रा. अकबर नगर) या युवकाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर परिसरात तर्कवितर्कांचा पूर उसळला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत यशस्वी सापळा रचला. तपासात उघड झाले की, मृतक आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दारूच्या नशेत क्षुल्लक वाद झाल्याने आरोपीने संतापाच्या भरात चाकूने वार करून मित्राची हत्या केली.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तो मोटरसायकल चोरीसह विविध गुन्ह्यांमध्ये सामील असून, वारंवार वास्तव्य बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. तथापि, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यवतमाळपर्यंत शोधमोहीम राबवून आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर आरोपीस पुढील तपासासाठी नांदगावपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम घुगे, उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि मनीष वाकोडे, सपोनि अनिकेत कासार (सायबर), सपोनि प्रियांका कोटावार (सायबर), तसेच पोलीस अंमलदार सुनिल लासूरकर, दीपक सुंदरकर, जहीर शेख, संग्राम भोजने, विकारा गुडधे, सैयद नाझीम, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, सागर ठाकरे, सुरज चव्हाण, प्रभात पोकळे, निखील माहूरे (सायबर) आणि सुषमा आठवले (सायबर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हे शाखेच्या झटपट आणि नियोजनबद्ध तपासामुळे अवघ्या 12 तासांत खुनाचा उलगडा होऊन आरोपीच्या अटकेने अमरावती शहर पोलिस दलाची प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली आहे.




