बिबट्याने घेतले गोठ्यातील दोन वासरांचे बळी

घटनेने परिसरात भीतीचे सावट

-शेतकर्‍यांत वन विभागाप्रती नाराजी
तिवसा / 18 सप्टेंबर : तिवसा तहसीलातील मौजा जेतापूर येथे तेंदूआने थैमान घालत गोठ्यातील दोन वासरांवर हल्ला केला. संतोष काशीनाथ चौधरी या शेतकर्‍याच्या गोठ्यात बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कव्हाड गव्हाण येथील रहिवासी संतोष चौधरी यांचे मौजा जेतापूर येथे शेत आहे. शेतात धान्य, कापूस साठविण्यासाठी आणि जनावरांना ठेवण्यासाठी स्वतंत्र गोठा आहे. शेतीबरोबरच ते दूध व्यवसायही करीत असल्याने त्यांच्या गोठ्यात गायी व म्हशी दीर्घकाळापासून आहेत. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक गोठ्यातील एक वासरू मृतावस्थेत आणि दुसरे गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले. चौकशीअंती बिबट्याने या वासरांवर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चौधरी कुटुंबासह गावकर्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवसा तहसील परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असल्याने स्थानिक शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आला आहे.
गावकर्‍यांनी तात्काळ वनविभागाला कळविले. संबंधित अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. मात्र वारंवार बिबट शेतकरी व नागरिकांच्या जीवावर उठत असल्याने वनविभागाने तातडीने परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात मोकाट बिबट्याच्या हल्ल्याचा धोका कायम असल्याने संरक्षणात्मक पावले उचलण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढला आहे. या घटनेनंतर जेतापूर परिसरात चर्चा सुरू असून लोकांमध्ये कधी कोणत्या घरावर बिबट्या धावून येईल? अशी भीती स्पष्टपणे जाणवत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button