शेतकर्यांकडून सक्तीने कर्जवसुली केली तर ठोकून काढू
बच्चू कडू आक्रमक, बँकांना इशारा

-बँक मॅनेजरला फोनवरून धमकी
अमरावती / 23 जुलै : राज्यातील शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसतानाच दुसरीकडे बँकांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. अमरावतीमध्ये एका बँक मॅनेजरला थेट फोन करून शेतकर्यांकडून सक्तीची वसुली केली, तर तिथेच ठोकून काढू! अशी इशारा वजा धमकी बच्चू कडू यांनी दिली.
अमरावतीतील टाकरखेडे गावातील एका शेतकर्याला बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने कोणतीही नोटीस न देता थेट घर हरजाबाबत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित शेतकर्याला आत्महत्येचा विचार येईपर्यंत मानसिक त्रास झाला, अशी माहिती कडू यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट फोन करून मॅनेजरला खडसावले. पेरणीचे दिवस असताना सक्तीची वसुली होत असल्याने शेतकरी संकटात आहेत. सरकार अजून कर्जमाफीबद्दल काही बोलत नाहीये, त्यामुळे उद्या कर्ज माफ झाल्यास बँक पैसे भरून देणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी बँक मॅनेजरला केला.
तुम्ही जर सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर मी धमकी दिली म्हणून माझ्या नावाची तक्रार पोलिसांत द्या, असे सांगून सक्तीची वसुली करायची नाही. जर तुम्ही वसुली करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी याआधी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्राणांतिक उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने लवकरच समिती गठीत करून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचवेळी, बँकांनी शेतकर्यांवर वसुलीसाठी दबाव टाकायला सुरुवात केल्याने कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
-…तर बँक मॅनेजरला त्याच बँकेत टांगू
शेतकर्यांनो घाबरू नका, फक्त एक मेसेज करा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. सक्तीची वसुली केल्यास बँक मॅनेजरला त्याच बँकेत टांगल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.




