चांदूरबाजार बंद यशस्वी, अर्ध नग्न अवस्थेत तहसिलदारांना निवेदन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची चौथ्या दिवशी धग कायम

चांदूर बाजार/11 जून– राज्यातील शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी जनतेचा खंदा लढवय्या नेता, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ, मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषणाला प्रारंभ केला आहे.चार दिवस उलटूनही सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज बुधवारी चांदूरबाजार बंदचे आयोजन करण्यात आले.बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 11:00 वाजता शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधव चांदुर बाजार तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. अर्धनग्न अवस्थेत तहसिलदाराच्या कॅबिन मधील तहसिलदारांच्या उपस्थीतीत आंदोलकांनी आपले कपडे काढून तहसिलदारांच्या टेबलवर ठेवून तहसिलदारांच्यावतीने बच्चु कडु यांच्या मागण्याचे निवेदन शासनाला दिले.या आंदोलनात प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यासह शेतकरी व दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. राज्यातील लाखो शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, सेंद्रिय खतांना अनुदान, तसेच दूध उत्पादकांना योग्य दर या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे ओशासन दिले होते. मात्र, निवडणुका संपून सत्तास्थापनेला अनेक महिने उलटले तरीही शेतकर्‍यांच्या समस्या जशाच्या तशाच आहेत. त्यामुळे शासनाच्या ’झोपेच्या सोंग’ विरोधात हा निषेध चांदुर बाजार तालुक्यातील शेकडो प्रहार कार्यकर्ते व शेतकरी वर्गात असून या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, हीच आमची मागणी आहे. हा लढा केवळ काहीजणांचा नाही, तर सर्वसामान्यांच्या हक्काचा आहे, असे सांगत आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी देत सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध तहसील कार्यालय येथे प्रहार तालुकाध्यक्ष संतोष किटुकले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले

संबंधित बातम्या

Back to top button