वलगाव जाळपोळ प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक
अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

-महावितरण वर्तुळात संतापाची लाट
-घटनेचा निषेध, कठोर कारवाईची मागणी
अमरावती / 16 जून: महावितरणच्या वलगाव येथील कार्यालयात जाळपोळ करुन सहाय्यक अभियंत्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अविनाश गोवर्धन निर्मळ (33) आणि विनित दिलीपराव तायडे (33) या दोन वलगाव येथील तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची तसेच असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काल रविवारी, दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वीज पुरवठा खंडित असल्याच्या कारणावरून महावितरणच्या वलगाव कार्यालयात आलेल्या अविनाश आणि विनित यांनी सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल कार्यालयातील टेबल व दस्तावेजवर टाकत आग लावली. यावेळी प्रभारी सहाय्यक अभियंता गोपाल इंगळे व सहकारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या तरूणांनी सहाय्यक अभियंता यांच्या अंगावर दुसर्या बाटलीतील पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अभियंता इंगळे व सहकार्यांनी यावेळी जिवाच्या आकांताने कार्यालयाबाहेर धाव घेतली आणि थेट वलगाव पोलिस स्टेशन गाठले.
या घटनेत महावितरणच्या कार्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महत्वाचे दस्तावेज जळाले आहे. तसेच कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वलगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध खालील भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. इतर व्यक्तीच्या मदतीने गुन्हा करण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, ज्वलनशील पदार्थाचा वापर करून इजा करण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातक हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक सेवकावर हल्ला करणे आणि शांतता भंग करणारे व दहशत निर्माण करणारे कृत्य करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे.
-कर्मचार्यांनी खचून जाउ नये
या घटनेचा महावितरण प्रशासनाने तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेनंतर अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी तत्काळ वलगाव कार्यालयाला भेट दिली. महावितरण कर्मचार्यांनी खचून न जाता भौतिक आणि तांत्रिक दोष दुर करून अखंडित वीज सेवा देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महावितरण प्रशासन कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही देवहाते यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना दिला.