मतांसाठी लाडक्या बहिणींना चटक लावली
यशोमती ठाकूर यांची घणाघाती टीका

-सरकारच्या धोरणांवर ताशेरे
अमरावती / 4 जून: लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही, तर त्यांना लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होती म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना दिली. आता ते समाज कल्याण, आदिवासी विभागाचा पैसा वळती करत आहे. आदिवासी विभाग व समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसर्या कोणत्याही योजनेसाठी वळवू शकत नाही, तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे. मात्र, सरकार कोर्ट, संविधान हे बाजूला सारून गोंधळ घालत आहे. लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर केली आहे.
राज्यात 50 लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरविल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सरकारला महिलांना सक्षम करण्याचं काम करायचं नाही. आज पन्नास लाख महिला अपात्र केल्या. येणार्या काळात आणखी महिला ते अपात्र करणार आहेत. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान याच मुद्यांवर बोलताना राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्रात आपण जेवढ्या योजना कार्यरत केल्या, त्यात काही बोगस लाभार्थी सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा आपण योजना जाहीर केली तेव्हा त्यात काही निकष जाहीर केले होते. तरी देखील विरोधक योजने विरोधात वारंवार कितीही अपप्रचार करत असले तरी योजनेसंदर्भातील कुठल्याही निकषामध्ये सरकारने कोणतेही बदल केले नाही. शिवाय, कुठल्याही लाभार्थ्यांपासून वसुली झालेले नाही. आपण आव्हान केलेलं आहे की, लाभार्थ्यांनी आपलं नाव मागे घ्यावं, माझी विनंती आहे की स्वतःहून त्यांनी आपलं नाव कमी करून टाकावं, पण दुसर्यांचा हक्क कोणी हिरावून घेत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि याबाबत सरकारच्या वतीने कार्यपद्धतीमध्ये, योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.