संतप्त नागरिकांची मध्यरात्री महाविरणवर धडक

नांदगाव पेठमध्ये विजेचा लपंडाव

-ग्रामस्थांच्या असंतोषाचा उद्रेक
नांदगावपेठ / 16 जून: गेल्या अनेक दिवसांपासून सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा असंतोषाचा रविवारी अखेर उद्रेक झाला आणि त्यांनी मध्यरात्री 1 वाजता नांदगाव पेठ येथील वीज वितरण कार्यालयात धडक दिली. प्रा. मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांनी बेजबाबदार प्रशासनाला यावेळी चांगलेच धारेवर धरले.
नांदगाव पेठ आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून विजेच्या लपंडावामुळे नागरिक, अबालवृद्ध, लहान मुले प्रचंड त्रस्त आहेत. रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. संपूर्ण दिवस विजेशिवाय घालविल्यानंतर रात्री सुद्धा एक वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. अखेर सहनशिलतेचा कडेलोट झाल्याने प्रा. मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात गावकरी वीज वितरण कार्यालयावर धडकले. मात्र, याठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. अभियंता बेहरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अशोभनीय भाषा वापरून नागरिकांचा अपमान केला. असा आरोप करित संतप्त ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले.
कोणताही वादळवारा नसतांना दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असून खासगी कर्मचार्‍यांच्या भरवशावर अभियंता बेहरे कारभार सोडून जातात. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यास अभियंता बेहरे यांना याबाबत सुद्धा माहिती नसते. हा बेजबाबदारपणा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून गावकरी नागरिक मात्र या सततच्या वीजपुरवठामुळे संतप्त झाले आहेत. विभागाने नागरिकांच्या या समस्येचा तोडगा काढावा, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.
तसेच अभियंता बेहरे यांची तात्काळ हकालपट्टी करून, जनतेच्या सेवेस तत्पर अधिकारी येथे नेमावेत. नागरिकांच्या संयमाचा अंत आता महावितरणने बघू नये. वीज वितरण कंपनीने तात्काळ अभियंता बेहरे सारख्या बेजबाबदार अधिकार्‍यांची बदली करावी अन्यथा वीज वितरण कार्यालय येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी दिला.

संबंधित बातम्या

Back to top button