शेतात वीज कोसळून बैलजोडी ठार
पार्डी शिवारातील घटना, पशुपालक संकटात

अंजनगाव बारी/ 16 जून : शेतात झाडाखाली विसावा घेत असलेल्या बैल जोडीच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात दोन्ही जनावरांचा मृत्यु झाला. ही घटना अंजनगाव बारीनजीक पार्डी देवी या गावात घडली. या घटनेमुळे पशुपालक शेतकरी संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची मागणी करण्यात आली आहे.
पार्डी शेत शिवारातील रतन सिंग जाखड यांच्या शेतात ही घटना घडली. जाखड यांची बैल जोडी नेहमीप्रमाणे शेतातच चराईनंतर एका झाडाखाली विसावा घेत होती. तेव्हा अचानक मुसळधार पाऊस व विजेच्या गडगडाटाला सुरुवात झाली. अशातच बैल जोडीच्या अंगावर वीज कोसठल्याने दोन्ही बैल जागेवरच गतप्राण झाले. या घटनेने परिसरातील पशुपालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. घटनेत जाखड यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुपालकाने संबंधित विभागाला पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आज पार्डी येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.