उपराष्ट्रपती निवडणूक : काँग्रेस बांधतय विरोधकांची मोट

राहुल गांधींचा पुढाकार, भाजपचा घाम निघणार

-इंडिया आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरणार
-‘एनडीए’साठी संख्याबळ अनुकूल
नवी दिल्ली / 24 जुलै: दोन दिवसापूर्वीच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांनी स्वीकारला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याची तयारी इंडिया आघाडीने केली आहे. त्यासाठीची रणनीती ठरली असून राहुल गांधी आणि काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. मित्र पक्षांना विश्वासात घेऊन नाव फायनल केले जाणार आहे.
त्यामुळे येत्या काळात ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराच्या नावावर भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठीकीत संसदीय मंडळाचे अध्यक्ष पीएम नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार दिला जाणार नाही, असे वाटत होते. मात्र, आता या निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसकडून सुरु झाली आहे. विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार असेल असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संसदेतील संख्याबळ एनडीएला अनुकुल आहे. मात्र, घटनात्मकदृष्ट्या देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदासाठी होत असलेली निवडणूक ही राजकीय लढाई असल्याने विरोधी पक्षाचा एकत्रित उमेदवार असणार आहे. दरम्यान, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचे राजीनामा का दिला यावरून चर्चा रंगली आहे. विरोधकांनी या सर्व घटनाक्रमावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यासोबतच या मुद्द्यांवरून एनडीए आघाडीतील मतभेद वाढवता येणार का? यावरून इंडिया आघाडीकडून चाचपणी केली जात आहे.
आगामी काळात होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरकारशी संघर्ष करण्याची तयारी काँग्रेसने (लेपसीशीी) सुरु केली आहे. त्यासाठी इंडिया आघडीतील घटक पक्षाशी बोलणी सुरु आहे. याबाबत पुढील आठवड्यात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात ’एनडीए’ आघाडीची बैठक होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी सध्या विदेश दौर्‍यावर गेले आहेत. चार दिवसांनंतर ते मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार ठरणार आहे. त्यासोबतच यावेळी ’एनडीए’ आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या तेलगू देसम, जेडीयू या पक्षाकडून उपराष्ट्रपती पदासाठी नाव सुचवण्यात आले तर त्या नावावर देखील चर्चा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे या बैठकीकडे लक्ष असणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून भाजपकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
लोकसभा व राज्यसभेतील 786 खासदारांपैकी सहा जागा रिक्त आहेत. दोन्ही सभागृहात भाजपला बहुमत नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भाजपला भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षाची सहमती मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळेच भाजपकडून मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम, संयुक्त जनता दल यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांची मनधरणी करावी लागणार आहे.
-विजयासाठी 394 मताची आवश्यकता
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेतील सदस्यांना मतदानाचा हक्क असणार आहे. ही निवडणूक जिकंण्यासाठी 394 मताची आवश्यकता आहे. लोकसभेत 542 सदस्यांमध्ये इंडिया आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे तर राज्यसभेच्या 285 सदस्यापैकी 129 सदस्याचा पाठींबा आहे. राज्यसभेत सध्या पाच तर लोकसभेत एक जागा रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 786 पैकी 422 सदस्यांचे समर्थन असून या बहुमतावर त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
‘एनडीए’ चा उमेदवार पीएम मोदी ठरविणार
‘एनडीए’ आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, जे. पी. नड्डा, हरिभाऊ बागडे यांची नावे देखील चर्चेत आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार ठरविणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button