दुचाकीच्या टोलवरून नितीन गडकरी भडकले

म्हणाले... खोडसाळपणा बंद करा

-वृत्त देणार्‍यांचाही केला निषेध
नागपूर/ 26 जून : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना नुकतीच चारचाकी वाहनाचलाकांना मोठा दिलासा दिला आहे. तीन हजार रुपयांमध्ये त्यांनी वर्षभरासाठी टोल पास उपलब्ध करून दिला आहे. यातच कोणीतरी ते आता दुचाकीवर टोल लावणार अशी अफवा पसरवली. काही माध्यमांनी याचे वृत्तही दिले. यावरून गडकरी चांगलेच संतापले असल्याचे दिसून येते. त्यांनी लगेचच याची दखल घेतली आणि हा खोडसाळपणा बंद करण्यास सांगितले. तसेच हे वृत्त देणार्‍यांचा निषेधही त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.
दुचाकी वाहनांवर टोल आकारला जात नाही. त्यावर टोल लावण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. यावर कुठलीची चर्चा नसताना टोल लावल्या जाणार असल्याचे वृत्त भ्रम निर्माण करीत असल्याचे गडकरी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशभर रस्त्यांचे जाळे विणले आहे. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये उड्डाणपुलांची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनीच सर्वप्रथम टोल नाक्याची संकल्पना मांडली होती. ती प्रत्यक्षात आणली. रस्त्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी या माध्यमातून उभा केला. मोठमोठ्या कंत्राटदारांना रस्ते व उड्डाणपुलांमध्ये गुतंवणूक करण्यासाठी आकर्षित केले. आता टोल नाक्यावर आकारल्या जाणार्‍या शुल्कावरू मोठा वाद निर्माण होत आहे.
विरोधकांमार्फत टोल घोटाळ्याचा आरोपही केला जात आहे. दोन टोल नाक्यांमधील अंतर किमान 40 ते 45 किलोमीटर असावे असा नियम असताना काही ठिकाणी या अंतरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय काही मार्गांवर वाहनांच्या संख्येवरून टोल नाक्याच्या जागाही बदलवण्यात आल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वतः गडकरी यांनीच नागपूर जिल्ह्यतील दोन टोल नाक्यांची जागा बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रामटेक तालुक्यातील मनसरचा टोल नाका पुढे ढकलण्यात आला. मात्र नागपूर-बैतुल महामार्गावरचा वाहनांसाठी सावनेर तालुक्याती पाटणसावंगी येथील टोल नाका अद्यापही आहे त्याच ठिकाणी आहे. गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी सावनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत हा टोला नाका हटवला जाईल, असे आश्वासन दिले होते. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी ‘टोल का खेल मैनेही शुरू किया था और मै ही बंद करूंगा‘ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर स्वतःचे चार चाकी वाहनचालकांच्या खिशाला परवडेल असा वर्षभरासाठी त्यांनी अवघ्या तीन हजार रुपयात टोल पास उपलब्ध करून दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button