लाडकी बहिणीचा पैसा वळवलेला नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

*म्हणाले – सर्व खर्च नियमानुसारच झाला

मुंबई /8 जून– विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयात मोलाची भूमिका बजावणार्‍या ‘लाडकी बहीण’ योजनेवर सध्या जोरदार वादंग सुरु आहे. या योजनेसाठी अन्य विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडत, लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागातून निधी वळवलेला नाही, असा दावा केला आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणार्‍या या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी रुपये वर्ग केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीदेखील या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी न्याय विभाग बंदच करा, असा टोलाही लगावला होता.यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या अर्थसंकल्पाच्या नियमानुसार अनुसूचित जाती व जमातींसाठीच्या योजना त्यांच्या संबंधित हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्यामुळेच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही तरतूद त्या हेडखाली केली आणि भाषणातही हे स्पष्टपणे नमूद केले की, रेग्युलर तरतुदीपेक्षा अधिकची तरतूद करण्यात आली आहे. फडणवीस पुढे म्हणाले, एखाद्या विभागासाठी राखून ठेवलेला निधी जर दुसर्‍या विभागात वापरला गेला, तरच त्याला ’निधी वळवला’ असे म्हणता येईल. मात्र, येथे तशी परिस्थिती नाही. जे पैसे त्या घटकासाठी खर्च व्हायचे आहेत, तेच त्यांच्या नावाने अर्थसंकल्पात दाखवले गेले आहेत. त्यामुळे कुठल्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही.सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील निधी वळवण्याच्या आरोपांवर काही प्रमाणात पडदा टाकला गेला असला, तरी विरोधक या मुद्द्यावर किती पुढे आक्रमक भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणारआहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button