आर्किटेक होण्याची इच्छा होती पण वकील झालो
सरन्यायाधीशांनी सांगितला आयुष्यातला टर्निंग पॉइंट

-जीवनाचा संघर्षमय प्रवास उलगडला
-मुंबईत बार काऊन्सिलतर्फे सत्कार
मुंबई / 18 मे: मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून भूषण गवई यांनी त्यांचा जीवनाचा संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. यावेळी त्यांनी काही भूतकाळातील प्रसंग सांगितले. सरन्यायाधीश गवई यांनी लहानपणी अमरावतीपासून सुरू झालेला प्रवास, नागपूर आणि मुंबई-दिल्लीतील अनेक घडामोडी विस्तृतपणे सांगितल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाषणादरम्यान अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई भावुक झाले.
भारताच्या सरन्यायाधीशपदाची भूषण गवई यांनी 14 मेला शपथ घेतली. त्यादिवशी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने जे प्रेम दिले, त्याने मी भारावून गेलो आहे. शपथविधीसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकिलवर्ग दिल्लीला उपस्थित होता. सरन्यायाधीशपदाच्या शपथेसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकील वर्ग दिल्लीत उपस्थित राहिले, असे इतिहासात पहिल्यांदाच पाहण्यास मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमरावतीमधून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. लहानपणी नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथून माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. आज मी जो काही आहे, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जितका सहभाग तितकाच माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचा हात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सुरुवातीला मला आर्किटेक होण्याची इच्छा होती. वकील होण्याची इच्छा नव्हती. मात्र वडिलांना त्यांच्या लहानपणी वकील व्हायचे होते. मात्र, एलएलबीच्या परीक्षेदरम्यान बाबा सत्याग्रहात अटक झाल्यामुळे ते तुरुंगात होते. त्यांची इच्छा मी पूर्ण करावी, असे त्यांना वाटत होते. त्यांचा आदेश मी मान्य केला आणि एलएलबीला प्रवेश घेतला. केसी महाविद्यालयात पदवी आणि सरकारी लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंतर आम्ही पुन्हा अमरावतीला शिफ्ट झालो. त्यावेळी पंजाबराव लॉ कॉलेजमध्ये विधीचे पुढील शिक्षण घेतले असे सरन्यायाधीश गवईंनी आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरलेला किस्सा सांगितला.
-आई-वडिलांकडून कष्ट शिकलो
त्या काळी परिस्थिती घरची बेताची होती. वडील आंबेडकर चळवळीत सहभागी होते. त्यामुळे घराची जबाबदारी आईवर होती. त्यात एकत्रित परिवार होता. वडिलांचे अनेक नातेवाईक एकत्र राहत होते. माझी आई आणि वडिलांची सर्वात लहान बहीण, माझी आत्या सर्व जबाबदारी पेलवत होत्या. या सर्वांना पाहून मला जगण्याची प्रेरणा घरातून मिळाली. माझ्या जडणघडतीत सर्वात मोठं योगदान माझ्या वडिलांचे आहे, असे भूषण गवई यावेळी बोलताना म्हणाले.