दोन कोटींच्या बनावट दरोड्याचा पर्दाफाश

भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

* संपूर्ण प्रकरण हे बनावट असल्याचे उघडकीस

जळगाव /5 ऑक्टोबर : गेल्या आठवड्यात जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेसमध्ये दरोडा पडल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे 1.82 कोटी रूपयांचे दागिने लंपास झाल्याचे सांगितले गेले. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाच्या तपासात हे प्रकरण बनावट असल्याचे उघड झाले. 72 तासांत सर्व संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या दरोड्याची घटना 30 सप्टेंबरला घडल्याचे सांगून सागर पारेख यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील शासकीय रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पारेख यांच्या तक्रारीत 52 सोन्याच्या बांगड्या आणि 35 सोन्याच्या अंगठ्यांचे एकूण 1.5 किलो वजनाचे व 1.82 कोटी रूपयांच्या किंमतीचे दागिने चोरी झाले असल्याचे नमूद केले होते.

तपासात हे उघड झाले की पारेख यांनी काही साथीदारांच्या मदतीने या बनावट तक्रारीद्वारे अधिकार्‍यांना दिशाभूल करण्याचा कट रचला होता. संशयितांनी खोट्या दरोड्याला खरे भासविण्यासाठी स्वतःला जखमी दाखवले होते. नंतर अंगठ्या व बांगड्या प्रवीणकडे सुपूर्त करून ठेवण्यात आल्या. प्राप्त माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने ताबडतोब कारवाई करून प्रवीणला ताब्यात घेतले आणि जप्त केलेल्या मद्दुमेळासह त्यास पोलिस ठाण्यात हजर केले. जप्त केलेल्या मद्दुमेळामध्ये 52 सोन्याच्या बांगड्या व 35 अंगठ्या होत्या, ज्यांचे वजन 1.6 किलो व किंमत सुमारे 1.82 कोटी रूपये होती.

भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने याप्रकरणी सागर पारेख (वय 40, नाशिक), सजंय कुमार (वय 27, पाली, राजस्थान), प्रवीण कुमार (वय 35, सिराहे, राजस्थान) आणि राकेश जैन (वय 53, मलबार हिल्स, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, निरीक्षक प्रकाशचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button