उद्धव- राज एकत्र आले तरी, ’ठाकरे ब्रँड’ आमच्याकडेच
कदम यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

खेड : राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खरा ठाकरे ब्रँड आणि खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. खेड येथे पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मुलाला वरळी मतदारसंघात मदत करणार्या नगरसेवकांना फोडले. मनसेचे सहाही नगरसेवक उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे खेचले. अशा लोकांसोबत राज ठाकरे जातील असे वाटत नाही. सध्या राज्यात ठाकरे ब्रँड आणि त्याचे राजकारणातील महत्त्व यावर चर्चा सुरू असतानाच, रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे या चर्चांना नवा रंग मिळाला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिंदे शिवसेनेकडूनही टीकेचे बाण सोडले जात आहेत.