हाणामारीप्रकरणी फौजदारी कारवाई करणार
विधानसभा अध्यक्षांकडून स्पष्ट इशारा

-घटनेचा अहवाल उद्याच येणार
मुंबई / 17 जुलै : विधिमंडळ परिसरात जी घटना घडलेली आहे, ती दुर्दैव आहे. याप्रकरण मी अहवाल मागवला असून तोउद्या मला मिळेल आणि त्यानुसार मी कारवाई करणार आहे. असे स्पष्ट शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या हाणामारीच्या घटनेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करेल आणि माझ्या अधिकारात सुद्धा जे अधिकार आहेत, त्यानुसार कारवाई करणार आहे. विधिमंडळात अशी हिंसक कृत्य होऊ देणार नाही, यासाठी कारवाई करावी लागेल अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावरुन चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. थेट विधानसभेच्या लॉबीतच दोन्ही आमदारांचे समर्थक भिडल्याने आमदार आणि कार्यकर्त्यांतेही गोंधळून गेले होते. अखेर, तेथील सुरक्षा रक्षकांनी पुढे येऊन हा वाद सोडवला, मात्र या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधितांवर कारवाईचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ह्या गुंडांना पास देणार्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी केली. तर, मी विधानसभा अध्यक्षांकडे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केल्याचं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देत फौजदारी कारवाई करणार, असे म्हटलं आहे.
विधानभवन परिसरात झालेल्या घटनेनंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकरांना बोलावून घेतले होते. दरम्यान, येथील सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांना सगळ्या घटनेची माहिती दिली. हे सगळं घडत असताना गोपीचंड पडळकर विधिमंडळात परतले आणि बावनकुळेंना भेटायला गेले. गोपीचंद पडळकर आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांची बैठक 10 मिनिटांत संपली आणि पडळकरांनी बाहेर येऊन दिलगिरी व्यक्त केली.




