… तर आतापर्यंत तक्रार का केली नाही
बोगस मतदानाची शंका होती

*आयोगाचा राहुल गांधींना सवाल
नवी दिल्ली/8 जून : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच, यावेळी निवडणुकीत अनेक बोगस मतदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावर आयोगाने त्यांचे हे आरोप फेटाळत, जर तुम्हाला बोगस मतदारांनी मतदान केल्याची शंका आहे तर आतापर्यंत काँग्रेसने त्याची तक्रार का केली नाही, असा सवाल गांधींनाच केला आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, निवडणुकीपूर्वी जेव्हा मतदारांची यादी तयार करण्यात आली तेव्हा 90 तक्रारी आल्या होत्या. त्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले. पण, त्यानंतर एकही नवीन तक्रार आली नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे महाराष्ट्रातील 1 लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर अशा तक्रारींची वाट पाहात आहेत. बोगस मतदार असतील तर काँग्रेस त्यांना आव्हान का देत नाही? यापूर्वीही आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले आहेत. आता पुन्हा एकदा आरोप झाल्यानंतर आयोगाने पुन्हा उत्तर दिले आहे. देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर काम करणारे साडे दहा लाख बीएलओ राहुल गांधी यांच्या अशा खोट्या आणि बिनबुडाच्या आरोपांमुळे संतप्त झाल्याचे आयोगाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाने मध्यंतरी संपर्क अभियानाअंतर्गत सर्व 6 राष्ट्रीय पक्षांसोबत वेगवेगळी बैठक आयोजित केली होती. काँग्रेस वगळता अन्य 5 पक्षांसोबत आयोगाची बैठक झाली. तर काँग्रेसने 15 मे रोजी आयोजित केलेली बैठक ऑपरेशन सिंदूरचे कारण सांगत रद्द केली. आता अनेक राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतरच ही बैठक होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये पराभव झाला की, आयोगाला दोष देणे हा एक नवीन पायंडा असल्याचे आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे. राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. कोणताही आरोप हा केवळ कायद्यावरच अविेशास दाखवत नाही तर या प्रक्रियेसाठी स्वतःच्याच पक्षाकडून निवडलेल्या हजारो प्रतिनिधींवर देखील अविेशास दाखवण्यासारखे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.