खटले दशकानुदशके चालणे चिंताजनक!

न्यायव्यवस्थेत दुरुस्तीची नितांत गरज

-सरन्यायाधीश भूषण गवईंचे मत
हैदराबाद / 12 जुलै: भारताचे सरन्यायाधीश भुषण रामकृष्ण गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत, ही व्यवस्था दुरुस्त करण्याची अत्यंत गरज आहे असे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी शनिवारी नालसार विधी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात बोलताना ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
न्यायालयीन खटले दशकानुदशके चालू शकतात आणि अनेकदा एखादा आरोपी निष्पाप असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्याने वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगलेला असतो, असे सांगताना त्यांनी न्यायप्रक्रियेतील विलंबावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आपल्या देशात अनेक वेळा खटले दशके उलटतात तरी सुटत नाहीत. काही प्रकरणांमध्ये व्यक्ती निर्दोष ठरल्यावरही त्यांनी वर्षानुवर्षे कारावासात काढलेले असतात. ही परिस्थिती खेदजनक आहे. न्याय मिळवण्यासाठीचा कालावधी इतका वाढतो आहे की सामान्य माणसाचा विश्वास प्रणालीवरून उडू शकतो. असे भूषण गवई म्हणाले.
त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा सल्ला दिला आणि शक्य असल्यास शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा आग्रह केला, जेणेकरून त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ओझं येणार नाही. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताना आर्थिक ओझ्यापेक्षा शिष्यवृत्ती किंवा मदतीच्या पर्यायांचा विचार करावा. तुमच्या कुटुंबावर आर्थिक ताण न आणता शिक्षणासाठी पुढे जा. तुमच्या ज्ञानाने तुम्ही या देशातील न्यायप्रणालीत सकारात्मक बदल घडवू शकता. हा समारंभ ‘जस्टिस सिटी’, हैदराबाद येथे पार पडला. या वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह, तसेच तेलंगणा उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती सुजॉय पॉल उपस्थित होते.
-तरुण, नागरिक बदल घडवतील
मी जरी म्हणत असलो की आपल्या न्यायव्यवस्थेची अवस्था सध्या अत्यंत नाजूक आहे, तरीही मला विश्वास आहे की आपल्या देशातील नागरिक या आव्हानांना सामोरे जातील आणि सुधारणा घडवून आणतील, असेही गवई यांनी नमूद केले. नवपदवीधर विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, आपली सर्वोत्तम तरुण प्रतिभा जर या न्यायसंस्थेतील अडचणी सोडविण्यास पुढे आली, तर आपण नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

संबंधित बातम्या

Back to top button