कोरोनाचे राज्यात 6, देशात 13 मृत्यू
रुग्णसंख्या 1 हजार पार

-धाकधुक वाढली, यंत्रणा सतर्क
नवी दिल्ली/ 28 मे : देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केलीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं अनेकांची धाकधुक वाढलीय. देशात आतापर्यंत 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झालाय. देशात कोरोना रुग्णसंख्येनं 1 हजारांचा टप्पा पार केलाय. भारतात कोविड-19 चे 4 नवीन प्रकार आढळलेत. यात एलएफ 7, एक्सएफजी, जेएन 1 आणि एनबी.1.1.8 कोरोना प्रकारांचा समावेश आहे. एनबी.1.1.8, एनबी.1.8.1, एमओ 435एस सारखे इतर प्रकार वेगाने पसरत आहेत. नव्या व्हेरिएंटच्या प्रसारामुळे होणार्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. मात्र सहव्याधी असणार्या नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या देशात केरळमध्ये कोरोनाचे 430 रुग्ण, महाराष्ट्रात 208 रुग्ण, दिल्ली 104 रुग्ण, गुजरात 83 रुग्ण, कर्नाटक 47 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महापालिका रुग्णालयात कोरोनावरील उपचाराला सुरुवात झालीय. सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 खाटा कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. तिथे सर्व सोयीसुविधा युक्त असा साडेतीनशे खाटांचे कोविड रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. त्यात ऑक्सिजन सिलेंडर, आयसीयू बेड, लहान मुलासाठी विशेष व्यवस्था, औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच आता कोरोना तुमचं दार वाजवण्याआधी तुम्ही काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवा, असे आवाहन करण्यात आलेलं आहे.