सर्व 243 जागा लढविण्याची चिराग पासवान यांची घोषणा

बिहारमध्ये ‘एनडीए’त फूट; भाजपला झटका

पटणा / 6 जुनै: बिहारमध्ये वर्षअखेरीस होणार्‍या विधानसभा निवडणुकीआधी अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला मित्रपक्षाकडून धक्का बसला आहे. केंद्रात मंत्री असलेले लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांनी हा झटका दिला आहे. चिराग पासवान यांनी रविवारी छपरा येथील राजेंद्र स्टेडिअमध्ये आयोजित नव संकल्प महासभेत प्रामुख्याने भाजपला धक्का देणारी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत सर्व 243 जागांवर पक्षाचे उमेदवार निवडणूक लढतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ते स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
राज्यातील प्रत्येत मतदारसंघात आमच्या पक्षाचा उमेदवार असेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. या घोषणेमुळे भाजप आणि संयुक्त जनता दलाचे टेन्शन वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत चिराग यांचे सर्व पाच उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या मतांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. पासवान म्हणाले, ही निवडणूक मी लढणार आहे. ही निवडणूक प्रत्येक बिहारीसाठी आणि बिहारी कुटुंबासाठी महत्वाची आहे. त्यासाठी जेव्हा मी म्हणतो की, चिराग पासवान निवडणूक लढणार, त्यावेळी मी तुम्हा हेही सांगतो की, चिराग पासवान सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल. प्रत्येक जागेवर चिराग पासवान बनून निवडणूक लढेन.
दरम्यान, चिराग यांनी यापूर्वीच आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उपमुख्यमंत्रिपदासाठीही आपण इच्छूक नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सर्व जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी पुन्हा एकदा दिल्याने त्यांच्या मनात नेमके काय राजकारण सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. राज्यात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार जाणार आहे. भाजप नेत्यांकडूनही हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. पण पासवान यांची भूमिका त्याविपरीत दिसत आहे. ते सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत. पासवान यांनी घोषणेप्रमाणे सर्व मतदारसंघात उमेदवार दिल्यास एनडीएला मोठा फटका बसू शकतो.

संबंधित बातम्या

Back to top button