देशात 2 टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना
तारखा जाहिर, काँग्रेसकडून स्वागत

नवी दिल्ली/ 4 जून : देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होईल. विरोधी पक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर केली आहे. काँगेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर दुसर्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होईल. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे. जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणनाही केली जाणार आहे. मागच्या महिन्यात मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली होती. 1931 नंतर भारतात जातनिहाय जनगणना झालेली नाही. तर देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. नियमांनुसार, जनगणना 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविडमुळे जनगणना होऊ शकली नव्हती. दरम्यान, केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेत डिजिटल पद्धतींचाही अवलंब केला जाणार आहे. डिजिटल वापरामुळे वेळ वाचेल आणि अचूकताही वाढेल. जातनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुमारे 3 वर्षांत पूर्ण होईल. या प्रक्रियेला पूर्वी सुमारे 5 वर्षे लागायचे. भारताची जनगणना 1948 च्या जनगणना कायदा आणि 1990 च्या जनगणना नियमांच्या तरतुदींनुसार केली जाते. भारताची शेवटची जनगणना 2011 मध्ये दोन टप्प्यात करण्यात आली होती. त्यानंतर आता ही जनगणना केली जात आहे.