विमान अपघातात 241 प्रवाशांचा …
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर थरारक घटना

* गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन
* संपूर्ण देशात शोककळा
* अपघातात खा.सुनील तटकरे यांचेही नातेवाईक
* पंतप्रधान मोदींसह दिग्गजांनी व्यक्त केल्या संवेदना
* महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा समावेश
* हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी
* 20 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती
अहमदाबाद /12 जून: अहमदाबाद : गुजरातमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. मात्र टेक- ऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच, केवळ 625 फूट उंचीवर असताना मेघानीनगर भागात हे विमान कोसळले. एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत किमान 241 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले असून महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, सीआरपीएफ तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या शिवाय 12 क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीनुसार यामध्ये 2 नवजात बाळ, 11 लहान मुले, 217 प्रौढ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात बी.जे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जेवत असलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांवरही मोठा आघात झाला. हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. भारतीय वैद्यकीय संघटनेनुसार, यामध्ये तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 45 विद्यार्थी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत 20 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राचेही सात प्रवासी उपस्थित होते. यामध्ये चार केबिन क्रू आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अपर्णा महाडिक (खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल यांची पत्नी आहेत.) महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि शनी सोंघरे. याशिवाय, राजस्थानमधील पाच प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला.अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी अधिकृतरित्या 204 मृतांची संख्या जाहीर केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर गुजरात आरोग्य विभागाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलतर्फे 6357373831 आणि 6357373841 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच, इग मेडिकलमध्ये डीएनए चाचणी सुरू असून नातेवाईकांना डीएनए नमुने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मृतांची ओळख पटवणे सुलभ होईल. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना ट्विटद्वारे व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, अहमदाबादमधील ही दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या घटनेमुळे मी हादरलो आहे. शब्दात सांगता न येणारे हे दुःख आहे. या दुःखाच्या क्षणी मी सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे. केंद्रातील मंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. मदत आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी दोघांनाही तातडीने अहमदाबादला जाऊन सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारकडून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेड आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून, मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नागरिकांनीही आपली भावना व्यक्त करत मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देश या दु:खद प्रसंगात एकत्र उभा आहे आणि सर्व स्तरावरून मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रशासनाकडून अपघाताच्या सखोल चौकशीचे ओशासन देण्यात आले आहे.
विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी या घटनेनं संपूर्ण देश स्तब्ध आहे, असं म्हटलं. भारत सरकार, गुजरात सरकार, पंतप्रधान यांच्यावतीनं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृत पणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली. घटनेनंतर तातडीनं गुजरात सरकारनं आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होतं. तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असंही अमित शाह यांनी सांगितलं.
भीषण अपघातामधून रमेश विेशासकुमार सुखरुप
अहमदाबाद येथून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्यानंतर विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता गुजरात पोलिसांनी एक प्रवासी जिवंत आढळला असल्याचा दावा केला आहे. 40 वर्षीय रमेश विेशासकुमार हे या भीषण अपघातामधून बचावले आहेत.रमेश विेशासकुमार हे सध्या उपचार घेत आहेत.
अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटणवणं कठीण
विमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे. आता डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ’टाटा’ प्रत्येकी एक कोटी देणार
’या क्षणाला जे दुःख झालं आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना’, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त केला. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.