आरसीबीच्या मिरवणुकीत चेगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यु

बंगळुरुत विजयी जल्लोषाला गालबोट

-चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर भीषण दुर्घटना
-व्हीक्ट्री परेड पाहायला तुफान गर्दी
-30 पेक्षा अधिकजण जखमी
बंगळुरू / 4 जून: बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आयपीएल विजेत्या आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या जल्लोषाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. या चेंगराचेंगरीत 30 हुन अधिकजण जखमी झाले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये 18 वर्षानंतर आरसीबीने चषक जिंकला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमा झाले होते. या स्टेडियमबाहेर लोकांना नीट उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. या स्टेडियमबाहेरच चाहत्यांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
चेंगराचेंगरीच्या या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरुतील ही चेंगराचेंगरीची घटना गेट नंबर-1 जवळ घडली आहे. स्टेडियमवर पोहोचण्याआधी आरसीबीचे खेळाडू कर्नाटका विधानसभेत गेले होते. तिथे कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनी आरसीबीच्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला. त्यानंतर खेळाडूंची बस चिन्नास्वामी स्डेडियकडे निघाली. आरसीबीच्या विजयी रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसंदर्भातील सूचना प्रशासनाने जारी केल्या होत्या.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोशिएशनद्वारे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर सुरक्षादलाने आरसीबीच्या संघाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये युवक एकमेकांच्या अंगावर पडल्याचे दिसत आहे. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक दरवाजे होते पण गर्दीचा संपूर्ण ताण एकाच दरवाज्यावर आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिस आणि स्टेडियम प्रशासनाने लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. ही लोकं कोणाचेही ऐकत नव्हते. अनेकांनी स्टेडिअमच्या भिंती ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. गेटवर झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
एका अधिकार्‍याने सांगितले की, लोकांना कोणत्याही परिस्थितीत आत जायचे होते. त्यांना ना गेट दिसला ना गार्ड. ते फक्त पुढे जात राहिले. स्थानिक लोकांनी सांगितले की, या गर्दीनंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तर दुसरीकडे, स्टेडिअमबाहेरील वातावरण खूपच उत्साही होते. अनेक जण ढोल-ताशांच्या तालावर नाचत होते, फटाके फोडत होते, जयघोष करत होते. पण गर्दी वाढत जाऊन नियंत्रणाबाहेर गेल्याने आनंदाचे रूपांतर किंचाळ्या, रडण्यात आणि ओरड्यात झाले.

-अंदाज 2 लाखांचा आले 6 लाख लोक
प्रशासनाने 2 लाख लोकांच्या गर्दीचा अंदाज लावला होता. पण मैदानाच्या आत आणि बाहेर जवळपास 6 लाख लोकं जमले होते. 32 हजार क्षमतेच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये जवळपास 1 लाख लोकं घुसल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवणं पोलिसांना कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. यावेळी अनेक जणांचा श्वास कोडला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. यावेळी गर्दीने त्यांना पायाखाली तुडवलं.

-उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेची उपायुक्तस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. घटनेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये भरपाई देण्यात येईल. तसेच जखमींना मोफत उपचार देण्याचे आदेशही दिले आहेत, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे. याचवेळी या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी केली आहे.

-हृदयद्रावक घटना : नरेंद्र मोदी
बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याबरोबर माझे विचार आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे घटनेबद्दल भाजपाने कर्नाटक सरकारवर टीका केली. भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र म्हणाले की, या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप बीवाय विजयेंद्र यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button