डोमक येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन मागे

मोर्शी/5 जून– मोर्शी तालुक्यातील डोमक येथील ग्रामस्थांनी विविध मागण्या संदर्भात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता गायकवाड,मोर्शीचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांच्या उपस्थितीत लेखी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांना लिंबू पाणी देऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले.
डोमक हे गाव 1500 लोकवस्तीचे गाव असून गावातील प्रमुख दळण- वळणाची रस्ते, रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तसेच गावाला लागून असणार्या नाल्यावर संरक्षण भिंत उभारण्यात यावी.या प्रमुख मागणी संदर्भात दि.2 जूनपासून ग्रामस्थांनी हनुमान मंदिर डोमक येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.गेल्या कित्येक वर्षापासून डोमक ते गणोजा,डोमक ते तरोडा हा दळणवळणाचा मुख्य मार्ग अतिशय खराब झाला असून खड्डा रस्त्यात की रस्ता खड्ड्यात अशी रस्त्याची दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. डोमक गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी तसेच गावातील रुग्णांना शहरातील दवाखान्यात जाण्यासाठी जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.तसेच पावसाळ्याच्या दिवसात डोमक गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर येऊन या पुलावरून मोठ्या प्रमाणात धो धो पाणी वाहत असतांना शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच बाहेरगावी जाणार्या नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो व त्यांना रात्री बेरात्री तासंनतास ताटकळत उभे राहावे लागते.तरी या नाल्यावर संरक्षण भिंत उभारण्यात यावी. तसेच गावात जाणार्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून टू व्हीलर फोर व्हीलर वाहनासह पादचार्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते.तरी डोमक ते गणोजा डोमक ते तरोडा हा रस्ता नव्याने बांधकाम करण्यात यावा. डोमक-गणोजा रोडवरील पुलांचे बांधकाम त्वरित करण्यात यावे.तसेच गावाला लागून असणार्या नाल्यावर संरक्षण भिंत उभारण्यात यावी. डोमक गावातील हनुमान मंदिर ते पाण्याची टाकी या मुख्य रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात यासाठी गावातील रमाकांत कोंडे,विक्रम राऊत,ज्ञानेश्वर कोरे, सुनील कोंडे,भूषण कोंडे,संदीप कोंडे, वेदांत कोंडे,अंकुश कोंडे, कार्तिक कोंडे,निलेश कोंडे,अनुप कोंडे,वैभव कोंडेदर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.शेवटी अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता गायकवाड साहेब, मोर्शीचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे,झगडे साहेब,रंगारी साहेब,राठोड साहेब, किशोर बाबुडे,खाडे मॅडम,बंडूभाऊ साऊथ यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी स्वरूपात दिल्यावर उपोषण कर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले. यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.